Sunday 29 March 2015

उद्योजकतेच्या जगतात

उद्योजकतेच्या जगतात

अजय आणि धनंजय दोघे एकाच कंपनीत नोकरी करत होते. त्यांचं सगळ सुरळीत चाललं होतं पण दोघांनाही कायम असं वाटायच की, आपण स्वत:चा काहीतरी उद्योगधंदा करावा. त्यासाठी दोघांनीही हळुहळु प्रयत्न सुरु ठेवलेच होते. अशातच, एक दिवशी अजयने नोकरीला रामराम ठोकून स्वत:चा उद्योगधंदा करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला अजयनी अगदी छोटया प्रमाणावर आपला उद्योगधंदा सुरु केला, पण पुढे बघता बघता त्याचा उद्योगधंदा वाढत गेला आणि अगदी थोडया कालावधीतच अजयने उद्योगधंद्यात आपलं शिखर गाठलं. धनंजयला देखील अजयचं हे यश बघून चांगलाच हुरुप आला आणि त्याने देखील नोकरी सोडून उद्योगधंद्यात पाऊल ठेवलं उद्योगधंद्यात पाऊल ठेवल्यापासून थोडेच दिवसात धनंजयला अडचणींनी जणू घेरलंचं 'प्रत्येकाला उद्योगधंदा सुरु करतांना सुरुवातीला अडचणी येतातचं' हा विचार करुन धनंजयने आपला संघर्ष सुरुच ठेवला पण अडचणींचा मारा सुरुच राहिला, पुढे तर कर्जाचे हप्ते थकले, बँकांचा तगादा सुरु झाला ह्या सगळया गोष्टींनी धनंजय चांगलाच त्रस्त झाला आणि त्याने उद्योगधंदा बंद करुन पुन्हा नोकरीकडे आपला मोर्चा वळवला. आश्चर्य म्हणजे धनंजयला पुन्हा चांगल्या पगाराची आणि हुद्याची नोकरी देखील लगेच मिळाली आणि पुन्हा सगळं व्यवस्थित सुरु झालं. ही झाली एक लहानशी गोष्ट. हे अजय आणि धनंजय कुठेही कुठल्याही कंपनीत असू शकतील. तसं पाहिलं तर वयाने, ज्ञानाने, शिक्षणाने आणि कामातल्या कौशल्यात देखील ते जवळजवळ एकाच पातळीवर होते, दोघेही मेहनती, महत्वाकांक्षी आणि जिद्दी होते, मग, फरक कुठे होता? फरक होता तो त्यांच्या नशिबात, एकाचं नशीब 'उद्योगात' तर दुस-याचं 'नोकरीत'.
'मला सध्याची नोकरी कधी बदलता येईल? ' 'मला नोकरीत बढती कधी मिळेल?' किंवा 'मला नोकरी कधी मिळेल?' या सारखे प्रश्न ज्योतिषाला नेहमी विचारले जातात पण त्याचबरोबर 'मी माझी सध्याची नोकरी सोडून एखादा व्यवसाय सुरु करावा का? ', 'कोणता करावा?' हेही प्रश्न विचारणा-या व्यक्तींची संख्या खूप आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्या व्यक्तीच्या प्रत्रिकेत 'उद्योजकता' आहे का? हे बघावं लागतं, थोडक्यात ती व्यक्ती अजय आहे की धनंजय आहे, हे बघावं लागतं. धंद्याच्या अडचणी विषयी पत्रिका दाखवायला येणा-या लोकांमध्ये, ब-याच लोकांची अडचण असते की, आमचा धंदा 'रोल' होत नाही. धंदा ही काही एकदाच होणारी घटना नाही, तो सातत्याने होणं जरुरीच असतं ह्यालाच धंदा 'चालणं' म्हणतात आणि असा धंदा 'चालण्यासाठी' नशीब लागतच लागतं. त्याशिवाय नुसते प्रयत्न करुन यश मिळत नाही. धंदा 'रोल' होणं किंवा 'चालणं ' हाच धंद्याचा मुळ गाभा आहे हे विसरुन चालणार नाही.
उद्योग/व्यवसाय कधी सुरु होईल? ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी दोन गोष्टी बघाव्या लागतात, म्हणजे मुळात त्या व्यक्तिच्या पत्रिकेत उद्योगधंद्याचा योग आहे का? आणि दुसरी म्हणजे महादशा अंतर्दशा उद्योगधंदा कधी दर्शवित आहेत? महादशा अंर्तदशेवर मी मागील एका लेखात माहिती दिली आहेचं. त्यामुळे तुम्हाला त्याची माहिती झाली असेलचं. आपण बरेच वेळेला बघतो की, एखादी व्यक्ती बरेच वर्ष नोकरी करत असते आणि नंतर ती उद्योग व्यवसायाला सुरुवात करते आणि यशस्वी होते. हा जो उद्योग व्यवसायाचा काळ आहे, हा या महादशा अंतर्दशेवर अवलंबून असतो तसचं, पुढे किती वर्ष धंदा उत्तम चालेल? कुठली वर्ष उद्योगासाठी विशेष चांगली आहेत? यासाठी देखील महादशा अंतर्दशेचा आधार घ्यावा लागतो. इथे एक मुद्दा सांगावासा वाटतो की, काही वेळेला काही व्यक्तिंच्या पत्रिकेत अगदी थोडे दिवसच उद्योग व्यवसाय असतो, तो विशिष्ट काळ उलटून गेला की परत ती व्यक्ती नोकरी करु लागते. उद्योग व्यवसायाच्या बाबतीत काही विचित्र उदाहरणं देखील बघायला मिळतात. एखाद्या व्यक्तीकडे उद्योगासाठी लागणारे सर्व गुण असतात जसं नवीन नवीन कल्पना, मार्केटिंगचे उत्तम कौशल्य वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टी असतात. ती व्यक्ती एखाद्या ठिकाणी नोकरी करत असते, त्या व्यक्तीला त्या कंपनीची, त्या उद्योगाची, त्या क्षेत्राची उत्तम जाण असते, अगदी त्या कंपनीच्या मालकापेक्षाही अधिक माहिती असते. मालकाच्या अनुपस्थितीत ती व्यक्ति जणु काही 'प्रती मालक' असल्याप्रमाणे कंपनीतल्या सगळया गोष्टी अगदी उत्तम रितीने हाताळत असते. पण एवढ सगळं असुनही त्या व्यक्तिच्या प्रत्रिकेत उद्योग व्यवसायाचा योग नसतो, नोकरीचाच योग असतो त्या व्यक्तिच्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग हा ती व्यक्ति काम करत असलेल्या कंपनीला किंवा त्या कंपनीच्या मालकालाच होणार असतो. अशा व्यक्तिला मला 'वजीर' म्हणावसं वाटतं 'वजीर' हा कदाचित राजापेक्षाही हुशार व ज्ञानी असु शकतो पण तो 'राजा' होऊ शकत नाही.
व्यवसायासाठी आणखी एका गोष्टीची गरज असते आणि ती म्हणजे 'कर्ज' कर्जाशिवाय मोठा व्यवसाय करणे हे आजकालच्या जगात केवळ अश्यकच आहे. कर्जाच्या संर्दभात बरेच मुद्दे उपस्थित होतात जसं 'कर्ज सहजगत्या मिळेल की, बरेच प्रयत्न करावे लागतील?' त्याच प्रमाणे कर्जाची परतफेड व्यवस्थित होईल का?' इत्यादी बाबीही अभ्यासाव्या लागतात धंदा भागीदारीत असल्यास 'कुठल्या भागीदाराने प्रयत्न केल्यास कर्ज सहजगत्या मिळेल?' हाही मुद्दा उपस्थित होतो. तसेच 'नोकर कसे मिळतील? तारक की मारक? हाही प्रश्न थोडा महत्वाचा ठरतो.
काही व्यक्तिच्या पत्रिका ह्या उद्योग धंद्यापेक्षा 'प्रोफेशन' ला चांगल्या असतात जसं चाटर्ड अकौटंट, डॉक्टर, वकील, टॅक्स कन्सलटंट, आर्किटेक्ट वगैरे यालाच आपण 'प्रायव्हेट प्रॅक्टीस' म्हणतो. थोडक्यात काय, तर अशा पत्रिका 'कन्सलटन्सी' क्षेत्राला चांगल्या असतात.
ज्या व्यक्तिंच्या नशिबात उद्योग व्यवसाय असतो ती व्यक्ति आपोआपच उद्योग व्यवसायात खेचली जाते. याबाबतीत आपल्याला अशीही उदाहरण बघायला मिळतील की अमुक अमुक व्यक्तीला नोकरी करायची होती त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले पण चांगली किंवा मनासारखी नोकरी मिळाली नाही किंवा नोकरीच मिळाली नाही म्हणून मग एखादा उद्योग सुरु केला आणि त्या व्यवसायात त्या व्यक्तिची खूप भरभराट झाली. काही वेळेला एखाद्या व्यक्तिच्या चांगल्या चालू असलेल्या नोकरीत अचानक अडचणी उत्पन्न होतात, नोकरी जाते आणि मग ती व्यक्ति एखादा उद्योग व्यवसाय सुरु करते आणि पुढे त्यात भरभराट होते.
तर, अशा या उद्योजकतेच्या विविध छटा. उद्योजकतेच्या जगतात शिरण्यापूर्वी नशिबाची साथ तपासून बघणं महत्त्वाचं ठरतं आणि ती जर असेल तर मग चला 'उद्योजकतेच्या जगतात'.


अभय गोडसे


Friday 27 March 2015

गुणवत्ता मोलाची

गुणवत्ता मोलाची

व्यक्तीचे नाव 'अ', शिक्षण - जेमतेम 10 वी पर्यंत कौशल्य - कुठलचं कौशल्य नाही, उलट कामचुकारपणा व बेफिकीरवृत्ती, आळशी स्वभाव- भयानक स्वार्थी, थापाडया, फुशारकी करणे नोकरी- चांगल्या बडया कंपनीत भरपूर पगाराची नोकरी नशीबाची साथ- भरपूर, प्रचंड, खूपच एकंदर आयुष्यातील यश - भरपूर आर्थिक यश, योग्यतेपेक्षा खूपच अधिक.    

व्यक्तीचे नाव - 'ब', शिक्षण - बी.एससी. हुशार विद्यार्थी कौशल्य - अनेक विषयांच सखोल ज्ञान, ज्ञानपिपासू वृत्ती, अनेक गोष्टीत निपुणता स्वभाव- मदतीचा हात कायम पुढे, कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, अति प्रामाणिक. नोकरी - लहानश्या कंपनीत जेमतेम पगाराची नोकरीनशीबाची साथ - जवळ जवळ नाहीच, अत्यल्प एकंदर आयुष्यातील यश- आर्थिक अपयश, योग्यतेपेक्षा खूपच कमी
 
तुमच्या आजुबाजुची माणसं एकदा आठवून बघा, तुमच्या कार्यालयातली, तुमची मित्रमंडळी, तुमचे शेजारी, तुम्हाला रोज भेटणारी माणसं, तुमच्या ओळखीचे लोक, तुमचे नातेवाईक, ह्या सगळयांच्याकडे एकदा नीट नजर टाका. ह्यामधल्या काही लोकांच्या बाबतीत तुम्हाला असं वाटेल की अरे, ह्या माणसाची योग्यता #क्षमता ही खरचं खुप आहे, ह्याने आत्तापर्यंत खर तर खूप प्रगती करायला हवी होती, पण, प्रत्यक्षात मात्र त्याची म्हणावी तेवढी प्रगती किंवा म्हणावं तेवढया उंचीवर तो माणूस पोचलेला नसतो. तर काही माणसांच्या बाबतीत तुम्हाला असं आढळेल की, अरे, ह्याला तर ह्याच्या योग्यतेपेक्षा खूपच यश मिळालय, खरं तर ह्याची तेवढी योग्यताही नाही पण, पठ्ठयाला बरच यश मिळालयं. 

एखाद्या माणसाची पत्रिका बघतांना असं लक्षात येतं की या माणसाची हुशारी, ज्ञान तसं काही फार नाही पण याला आयुष्यात खूपच छान यशं मिळणार आहे. तर काही पत्रिकांच्या बाबतीत असं लक्षात येत की, या माणसाची हुशारी, व्यवहार चातुर्य, विषयाचं ज्ञान आणि एकंदरच योग्यता ही खरचं खूप आहे, पण त्या मानाने याला आयुष्यात यश मिळणार नाही. तर काही वेळेला असंही लक्षात येत की, या माणसाची जेवढी योग्यता # क्षमता आहे त्याचप्रमाणात त्याला यश देखिल मिळणार आहे. ह्यावरुन असं लक्षात येतं की, पत्रिकेची गुणवत्ता ही दोन प्रकारची असते. पहिली म्हणजे त्या माणसाची योग्यता म्हणजेच, त्या माणसाची बौध्दिक क्षमता, विषयाचं ज्ञान, कौशल्य, व्यवहार चातुर्य, नितिमत्ता, प्रामाणिकपणा, मेहनती वृत्ती, जिद्द, महत्वाकांक्षा वगैरे वगैरे आणि दुसरी म्हणजे त्याच्या पत्रिकेतील यशाची गुणवत्ता म्हणजेच त्याला नशिबानी दिलेली साथ. ह्यापैकी पहिल्या प्रकारची गुणवत्ता खूप असेल पण दुसऱ्या प्रकारची गुणवत्ता जर फारशी नसेल, तर ते बरोबर ठरणार नाही. तसचं जर दुसऱ्या प्रकारची गुणवत्ता असेल पण पहिल्या प्रकारची गुणवत्ता नसेल तर काही प्रमाणात का होईना पण जनंमानसात थोडीतरी निंदा नालस्ती होईलचं खरं बघितलं, तर एखाद्या व्यक्तीची जेवढी क्षमता, योग्यता असेल त्याच्या समप्रमाणातच त्याला यश मिळण हे सगळयानांच अपेक्षित असतं पण तसं घडतच असं मात्र नाही. यावरुन आपल्या असं लक्षात येईल की आयुष्यातील यशाचं समिकरण हे खालीलप्रमाणे आहे. 

माणसाची योग्यता + नशिबाची साथ = आयुष्यातील यश
काही माणसं मात्र खरच खूप भाग्यवान असतात. त्यांची पहिल्या प्रकारची गुणवत्ता म्हणजेच बुध्दिमत्ता, कौशल्य, व्यवहार चातुर्य, ही तर अफाट असतेच पण त्याचबरोबर दुस-या प्रकारची गुणवत्ता म्हणजेच 'नशिबाची साथ' ही देखील प्रचंड प्रमाणात असते, अशा व्यक्तींना आयुष्यात भरघोस यश मिळतं. पण त्या वेळेला त्यांनी 'विद्या विनयेन शोभते' या उक्तीप्रमाणे जमिनीवर राहाणंच शोभून दिसतं. भारतातल्या एका प्रसिध्द गायिकेने एका मुलाखतीत म्हटलं होत की, 'आमच्या सारखे चांगल्या आवाजाचे लोक कितीतरी असतील किंवा कदाचित आमच्यापेक्षा चांगले गाणारेही असतील पण आमच्यावर ईश्वराची कृपा आहे म्हणूनच आम्ही या पदाला पोहोचलो' थोडसं विषयांतर होत असलं तरी अल्बर्ट आईनस्टाईनची एक गोष्ट इथे मला सांगाविशी वाटते प्रसिध्द शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन एकदा एके ठिकाणी कसलीतरी वाट पहात उभे होते. थोडयावेळाने, त्यांच्या बाजूला एक तरुण मुलगा येऊन उभा राहिला. त्याच्या हातात भौतिकशास्त्राची जाडजुड पुस्तकं होती, ती पाहून आईनस्टाईननी त्याला सहज विचारलं की, तू भौतिकशास्त्राचा अभ्यास करतोयस का ? त्यावर तो माणूस अत्यंत गर्वाने म्हणाला, 'मी भौतिकशास्त्राचा डॉक्टरेट आहे' आणि एक तुच्छ कटाक्ष टाकून त्याने आईनस्टाईनला विचारलं की, 'तुम्ही कोण आहात ? ' त्यावर प्रसिध्द शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन म्हणाले 'मी भौतिकशास्त्राचा एक विद्यार्थी आहे.

काही वेळेला पत्रिका दाखवून झाल्यानंतर काही व्यक्ती विचारतात की, 'आमच्या पत्रिकेचं मुल्यमापन तुम्ही कसं कराल? १० पैकी द्यायचे झाल्यास, किती गुण तुम्ही आमच्या पत्रिकेला द्याल?' ह्या प्रश्नाचं उत्तर हे आपण कुठल्या आधारावर मुल्यमापन करणार ह्यावर अवलंबून आहे. साधारणत: व्यक्तीच्या आयुष्यामधे स्वभाव, शिक्षण, नोकरी /धंदा, पैसा, आरोग्य, विवाह सौख्य आणि संतती या सात गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. यापैकी एका जरी गोष्टीत दारुण अपयश आलं तरी आयुष्याचा समतोल ढळू शकतो. बाकी सगळं चांगलं आहे पण संतती नाही, संतती असेल तर विवाहसौख्यात कमतरता, विवाहसुख उत्तम असेल तर प्रकृतीची अडचण, अशा अनेक गोष्टी असू शकतात. वरील सातही गोष्टी उत्तम असणा-या व्यक्ती ह्या थोडयाच असतात, ही सातही प्रकारची सुखं खूप उत्तम प्रमाणात मिळाली आहेत, अशा व्यक्ती थोडयाच असतात. पत्रिकेच्या अनुषंगाने मुल्यमापन करतांना ह्या सातही गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं सातपैकी कुठल्यातरी एकाच गोष्टीचा एकांगी विचार करुन मुल्यमापन करता येणार नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचं करियर अतिशय उत्तम आहे, त्या व्यक्तीने भरपूर पैसा, मानमरताब मिळवला आहे पण लग्नचं केलेलं नाही, किंवा त्या व्यक्तीला संसारसुख किंवा विवाहसौख्य शुन्य आहे, तर, अशा पत्रिकेच मुल्यमापन करतांना फक्त करियर उत्तम म्हणून अधिक मुल्यमापन करता येणार नाही कारण त्याच बरोबर संसारसुख शुन्य आहे. तुम्हाला काही अशा व्यक्ती देखील माहीती असतील की ज्यांनी आयुष्यात काहीही प्रचंड करुन दाखवलेलं नाही किंवा त्या प्रचंड कर्तृत्ववान नाहीत पण वरील सात महत्वाच्या गोष्टीचा विचार केला तर ती सातही सुख त्यांना ब-याच अंशी चांगल्या प्रमाणात मिळाली आहेत, म्हणजे आयुष्यात त्यांना जेव्हा ज्या गोष्टीची गरज असते तेव्हा ती गोष्ट त्यांना मिळालेली आहे, उदाहरणार्थ लहानपणी आई- वडिलाचं छत्र, नंतर शिक्षण, नंतर नोकरी / धंदा, पैसा, पुढे लग्न, बायको, मुलं-बाळं, पुढे निवृत्त जीवन असं सगळं ब-याच अंशी मिळालेलं आहे, त्यांच्या आयुष्यात तसे फारसे चढ-उतार आलेले नाहीत, त्यांच आयुष्य हे खूपसं 'सरळ' गेलेलं आहे. अर्थातच, अशा व्यक्तींच्या पत्रिकेला १० पैकी बरेच जास्त गुणं मिळतील. थोडक्यात सांगायच, तर इथे 'गुण' हा विषय असल्यामुळे, हे परिक्षेत पास होण्यासारखं आहे. एकाच विषयात 100 पैकी 99 गुणं आणि इतर विषयात 'नापास' असं होऊन चालत नाही, सगळयाच विषयात पास व्हावं लागतं तरचं सपूर्ण परिक्षा उत्तीर्ण होता येतं.

मघाशी मी म्हटल्याप्रमाणे, काही व्यक्तींची दोन्हीही प्रकारची गुणवत्ता, म्हणजेच 'योग्यता' आणि 'नशीबाची साथ', ह्या दोन्ही प्रकारची गुणवंत्ता ही उत्तम असते, त्यामुळे अशा व्यक्ती अर्थातच आयुष्यात खूप यश मिळवतात, अशा व्यक्तींच्या पत्रिका 'अतिउत्कृष्ट पत्रिका' या विभागात येतात. अशा व्यक्तींना फार काळ अपयश येत नाही. ह्या व्यक्ती जे जे करतात त्यात त्यांना यश येत जातं तर, ह्याच्या अगदी उलट, काही पत्रिका ह्या 'निकृष्ट दर्जाची कुंडली' ह्या विभागात येतात. ह्या व्यक्तींची दोन्हीही प्रकारची गुणवत्ता चांगली नसते. त्यांची योग्यता देखील नसते आणि 'नशीबाची साथ' देखील नसते. स्वभाव, शिक्षण, नोकरी / धंदा, पैसा, आरोग्य, विवाहसौख्य आणि संतती या सात गोष्टीपैकी बहुतांश गोष्टीमधे अशा व्यक्तींना अपयश येतं. 'अतिउत्कृष्ट पत्रिका' आणि निकृष्ट पत्रिका' अशी दोन्हीही प्रकारची माणसं आपल्याला आपल्या आजुबाजुला बघायला मिळतात. 

साधारणत: 'गुणवत्ता' म्हटलं की आपल्याला फक्त त्या 'माणसाची' गुणवत्ताच दिसते पण त्याचबरोबर आयुष्यात यश मिळवण्यासाठी 'पत्रिकेची गुणवत्ता' ही देखील तितकीच महत्त्वाची बाब ठरते, हे हि लक्षात हवं शेवटी, 'गुणवत्तेला पर्याय नाही' हेच खरं, म्हणूनच, 'गुणवत्ता मोलाची'

 
अभय गोडसे

माणसं वाचताना..

2003 पासून Astrology consultation करत असल्यामुळे, वाचनाची आवड नसली तरी, माणसं वाचायची सवय लागली आहे. ह्यासंबधीच हा एक किस्सा... 2018 मधे आमच...